पश्चिम घाटातील होम-स्टे, रिसॉर्ट,वसाहती व बागायती यांच्यावर कारवाई,अतिक्रमण हटवण्याचे स्पष्ट निर्देश
बेंगळुरू: बेळगाव, कारवार, मंगळूर, कोडगू, चिक्कमंगळूर, शिमोगा, म्हैसूर, चामराजनगर, हासन यासह राज्याच्या पश्चिम घाटातील 2015 पासूनचे वनजमिनींवरील सर्व अतिक्रमण हटवण्याचे स्पष्ट निर्देश वन आणि पर्यावरण मंत्री ईश्वर खंड्रे यांनी दिले आहेत.

यासंदर्भात मंत्री ईश्वर खंडे यांनी वनखात्याच्या अप्पर मुख्य सचिवांना सूचना दिली आहे. पश्चिम घाटाच्या सर्व वनक्षेत्रातील बेकायदेशीर किंवा अतिक्रमण करून निर्माण केलेल्या वसाहती, बागायती, होम स्टे आणि रिसॉर्ट यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
निसर्गसंपन्न पश्चिम घाटाच्या टेकड्या आणि वनभागात वृक्षतोड करून कॉफीचे मळे बनविणे, घरे, होम-स्टे, रिसॉर्ट निर्माण करणे आणि मातीची धूप रोखणारी भलीमोठी झाडे तोडून रस्ते निर्माण केल्यामुळे दरड, भूस्खलनाच्या दुर्घटना वारंवार घडत असल्याचे तज्ज्ञांचेमत आहे.
ही बाब सरकारने गांभीर्याने विचारात घेतली आहे, असेही ईश्वर खंड्रे यांनी म्हटले आहे. डोंगर आणि घाट परिसरात अवजड वाहनांची वाहतूकही धोक्याची आहे.
वीकेंडला ट्रॅव्हल आणि ट्रेकिंगच्या नावाखाली डोंगर आणि वनभागात हजारो लोक येतात. अशा प्रकारांमुळे दुर्घटनांमध्ये भर पडल्याचे मंत्री ईश्वर खंडे यांनी नमूद केले आहे. त्यामुळे भविष्यात वनभागातील ट्रेकींगवरही निर्बंध येण्याची शक्यता आहे.

Western Ghats region faces a constant onslaught due to unbridled ‘development’, felling of trees and mining, illegal homestays and resorts