लोंढा फाट्यापासून गावापर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था; ग्रामस्थांचा संताप, तात्काळ दुरुस्तीची मागणी
लोंढा (ता. खानापूर): बेळगाव-पणजी महामार्गावरील लोंढा फाट्यापासून लोंढा गावाकडे जाणारा सुमारे 300 मीटर लांबीचा रस्ता अत्यंत खराब स्थितीत असून, मोठमोठे खड्डे, उखडलेले डांबर आणि तीव्र उतारांमुळे हा रस्ता अपघातप्रवण बनला आहे. गेली चार वर्षे या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी प्रलंबित असून, ग्रामस्थांनी तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याची जोरदार मागणी केली आहे.
‘लोंढा जंक्शन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणाहून गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र, रस्त्याची दयनीय अवस्था आणि उतारांमुळे वाहनचालकांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत आहे. ब्रेक फेल झाल्यास थेट महामार्गावरील वाहतूक धडकण्याची शक्यता असून, यामुळे संभाव्य मोठ्या अपघातांचे संकट कायम आहे.

या रस्त्याचा वापर इंदिरा विद्यालय व लोंढा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसह शेकडो नागरिक दररोज करतात. विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली असून, पालकांमध्ये याविषयी तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
ग्रामपंचायतीमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार निवेदने देण्यात आली, तरीही अद्याप रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. प्रशासनाची दुर्लक्ष वृत्ती पाहता ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून, “मोठा अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
स्थानिक प्रशासनाने तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.