शिक्षणामुळे मिळते संघर्षाचे बळ: सातनाळी मराठी शाळेच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्यात पत्रकार वासुदेव चौगुले यांचे प्रतिपादन
सातनाळी (ता. खानापूर): पायाभूत सुविधांपासून वंचित असतानाही सातनाळी सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत मिळवलेले यश केवळ कौतुकास्पदच नव्हे, तर अभिमानास्पद आहे. संकटांना संधी मानत या विद्यार्थ्यांनी परिस्थितीशी लढत आपले भविष्य घडवले आहे. सातनाळी गावच्या सरकारी मराठी शाळेने अनेक पिढ्यांच्या घडणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार वासुदेव चौगुले यांनी केले.

ते सातनाळी सरकारी मराठी प्राथमिक शाळेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुंडलिक दळवी होते.
चौगुले पुढे म्हणाले, “आजही सातनाळीतील विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च शिक्षणासाठी साकवावरून प्रवास करावा लागतो. गावापर्यंत बस सेवा नसल्याने विद्यार्थ्यांना लोंढा येथे पायी जावे लागते. मात्र, या सर्व अडचणींवर मात करून ते आपले भविष्य घडवत आहेत. त्यांची ही जिद्द आणि चिकाटी नवी यशोगाथा लिहिणार आहे.”

या सुवर्ण महोत्सव सोहळ्यात विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी शाळेविषयी व शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. प्रतिकूल परिस्थितीतही या गावाने माणुसकी आणि संस्कार जोपासले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात नितेश मिराशी व नमिता मिराशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या वेळी शाळेचे माजी शिक्षक बी. एम. पाटील, सुनील कुंभार, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग नाईक, सीआरपी सुनील शेरेकर, बी. ए. देसाई, प्रशांत वंदुरे-पाटील, एफ. आय. मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.मुख्याध्यापक डी. एस. खोत यांनी स्वागत केले, तर रामचंद्र गावकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एस. परब यांनी केले.
मुख्याध्यापक डी. एस. खोत यांनी स्वागत केले, तर रामचंद्र गावकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एस. परब यांनी केले.