खानापूर

खानापूर तालुक्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, शेतात आग विझवताना घडली घटना

खानापूर: तालुक्यातील कारलगा येथे उसाच्या फडाला लागलेल्या आगीत एका शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. 13) सायंकाळी घडली. तुकाराम रवळू पवार (वय 75, रा. कारलगा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

तुकाराम पवार यांनी त्यांच्या शेतातील ऊस कारखान्यास पाठवून काही टन ऊस बियाण्यासाठी साठवून ठेवला होता. संध्याकाळी सहाच्या सुमारास बियाणाजवळील रौंद्याला आग लावत असताना ती आगीने अचानक उसाच्या राशीला वेढले. ऊस जळताना पाहून पवार यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, धुरामुळे गुदमरून ते त्या आगीत अडकले आणि त्यातच त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

घटनास्थळी शेतातच काम करणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांनी आगीच्या ज्वाळा पाहून जोरदार आरडाओरडा केला. मात्र, तोपर्यंत पवार यांचा मृत्यू झाला होता. गावकऱ्यांना माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली.

या घटनेची माहिती नंदगड पोलीस स्थानकाला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनीही घटनास्थळी भेट दिली आणि शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याच्या सूचना दिल्या.

तुकाराम पवार यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण कारलगा-चापगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते