खानापूर
कुसमळी परिसरात पूल वाहून गेला; चोर्ला घाट मार्ग ठप्प, नागरिक हैराण
बेळगाव, १५ जून : बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुसमळीजवळील पर्यायी पूल पूर्णतः वाहून गेला आहे. परिणामी, बेळगाव ते चोर्ला घाट मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली आहे.
सध्या चोर्ला मार्ग हा गोवा व बेळगाव दरम्यानचा महत्त्वाचा दळणवळण मार्ग असून, पूल वाहून गेल्यामुळे या मार्गावर दोन्हीकडून वाहने अडकली आहेत. पर्यायी मार्ग वापरण्याची वेळ नागरिकांवर आली असून त्यामुळे प्रवासाचा कालावधी आणि खर्चही वाढला आहे.
स्थानिक प्रशासनाकडून पंचनामा करून दुरुस्तीचे प्रयत्न होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या मार्गावर प्रवास टाळावा, असा सल्लाही देण्यात आला आहे.