खानापूर

राजहंसगडावर आगीचा कहर, दुकाने भस्मसात

बेळगाव :  अज्ञातांनी राजहंसगड किल्ल्याच्या पायथ्याशी आग लावल्याने जवळील खेळणी दुकाने जळून खाक झाली आहेत. या आगीने काही वेळातच उग्र रूप धारण केले आणि जोरदार वाऱ्यामुळे ती राजहंसगड किल्ल्यावर पोहोचली. यामुळे परिसरात मोठी धावपळ उडाली. विशेषतः खेळणी विक्रेत्यांची चार दुकाने या आगीच्या कचाट्यात सापडून पूर्णतः जळून खाक झाली. सुदैवाने नागरिकांनी वेळीच स्थलांतर केल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आगीने घेतले रौद्ररूप

भर उन्हात लागलेल्या आगीला जोरदार वाऱ्याने अधिकच भडकवले. पाहता पाहता ही आग यरमाळ गावाकडून राजहंसगड किल्ल्याकडे सरकली. आगीच्या भडिमारामुळे दुकाने, परिसरातील झाडे, इलेक्ट्रिक केबल आणि इतर साहित्यही भस्मसात झाले.

अग्निशमन दलाची तत्परता आणि पोलिसांचा तपास

घटनास्थळी उपस्थित प्रवासी मित्र पोलिसांनी तत्काळ बेळगाव अग्निशमन दल व पोलिस कंट्रोल रूमशी संपर्क साधला. मात्र, ते येईपर्यंत आगीने मोठे नुकसान केले होते. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

पर्यावरणप्रेमींचा संताप

एकीकडे सरकार आणि पर्यावरणप्रेमी ‘झाडे लावा, झाडे वाचवा’ यांसारख्या मोहिमा राबवत आहेत, तर दुसरीकडे अशी हेतुपुरस्सर आग लावून निसर्गाची मोठी हानी केली जात आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

➡️ संपूर्ण घटनेचा तपास सुरू असून, पोलिस प्रशासन याबाबत पुढील कारवाई करणार आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते