खानापूर
थार चालकाचा थरार – पूरग्रस्त पुलातून घातली गाडी
खानापूर: तालुक्यातील हालत्री नदीवर पूरपरिस्थिती असतानाही, एका थार जीप चालकाने पुलावरून धाडसी – पण अत्यंत धोकादायक – निर्णय घेत गाडी पाण्यातून चालवत नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सततच्या मुसळधार पावसामुळे हालत्री नदीला पूर आला आहे आणि पुलावरून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने वाहतूक बंद ठेवली असतानाही संबंधित चालकाने निष्काळजीपणे पुल ओलांडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र एक मोठा अपघात टळल्याचे स्थानिकांनी सांगितले.
या घटनेबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून, अशा बेजबाबदार कृतीमुळे इतरांना चुकीचा संदेश जातो, असे म्हणत प्रशासनाने यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.