बैलजोडीची दुर्मिळता! खानापुरात एका दिवसाच्या मशागतीसाठी 2000 रुपये दर!
खानापूर तालुक्यात निसर्गाने दाखवली आपली हिरवी जादू! वळीव पावसाच्या हजेरीने माती झाली तृप्त आणि शेतकऱ्यांच्या मनात फुटली आशेची पालवी! मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागताच, खानापूरचा बळीराजा आता कसतोय आपली कंबर. शेतीकामांसाठी लागणारे अवजारं झाली जमा आणि भाताच्या रोपांना मातीत रुजवण्यासाठी शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत आकाशाकडे!
खानापूर: तालुक्यातील हलगा-मेरडा भागात तर भात पेरणीची लगबग सुरू झाली आहे. आता शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा बोलबाला असला तरी, ट्रॅक्टरच्या धावपळीत कुठेतरी हरवत चालली आहे आपली पारंपरिक शेतीची शान. गावोगावी बैलजोडी दिसेनाशी झाली आहे आणि म्हणूनच जिथे अजूनही बैलांच्या मदतीने शेती होते, तिथे एका दिवसाच्या मशागतीसाठी शेतकऱ्याला मोजावे लागताहेत तब्बल 2000 रुपये!
पण या सगळ्या धावपळीत आणि बदलातही, खानापूरच्या शेतकऱ्यांचा उत्साह मात्र तसूभरही कमी झालेला नाही. ‘वेळेवर पाऊस आला तर यंदाची भात शेती नक्कीच बहरणार,’ असा आशावाद इथल्या मातीच्या मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.