बेळगावात म्हादई आणि कळसा-भांडुरा प्रकल्पांविरोधात भव्य जनआंदोलन: ‘रॅली फॉर बेळगाव’ द्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव, ३ जून २०२५: म्हादई आणि कळसा-भांडुरा प्रकल्पांमुळे पश्चिम घाटातील जैवविविधता आणि वनसंपदेला होणाऱ्या धोक्याविरोधात तसेच उत्तर कर्नाटकात वाळवंटीकरण होण्याची शक्यता लक्षात घेऊन, पर्यावरणप्रेमी संघटना आणि शहरवासीयांनी आज बेळगावात ‘रॅली फॉर बेळगाव’ हे भव्य जनआंदोलन छेडले. हिडकल जलाशयाचे पाणी हुबळी-धारवाडकडे वळवण्याच्या प्रकल्पालाही या आंदोलनात विरोध करण्यात आला. या मोर्चानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
खानापूर तालुक्यासह बेळगावासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या म्हादई नदीचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने आयोजित या आंदोलनासाठी आज सकाळी सरदार हायस्कूल मैदानावर पर्यावरणप्रेमी, नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने जमले होते.
यावेळी १७ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती सिद्दीमा पांडे हिने आपले विचार मांडले. “आपल्या नद्या, जंगले आणि परिसंस्था वाचवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी मी येथे आले आहे,” असे ती म्हणाली. “जंगलांविना झाडे आणि पाण्याविना मानवी अस्तित्व शक्य नाही. या मोर्चाचा भाग होऊन आपण ‘पर्यावरण आणि म्हादई नदी वाचवण्यासाठी मी काय करू शकतो?’ याचा विचार करावा,” असे आवाहन तिने केले. केवळ मोर्चात सहभागी न होता, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे महत्त्व तिने अधोरेखित केले. “आपण कितीही पैसा कमावला किंवा पायाभूत सुविधा निर्माण केल्या, तरी शेवटी झाडेच आपल्याला जिवंत ठेवणार आहेत. त्यामुळे या निसर्गाचा आवाज आपण बनले पाहिजे,” असे ती म्हणाली.
एका स्वामीजींनीही यावेळी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, ऋषीमुनींनी प्राचीन काळापासून जंगलांचे जतन मानवाच्या कल्याणासाठी केले आहे. जंगलांचा ऱ्हास झाल्यास वन्यजीव नष्ट होतील आणि अखेरीस मानवी अस्तित्वही धोक्यात येईल. विकासाच्या नावाखाली निसर्गाला हानी पोहोचवणे थांबवले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले आणि म्हादई नदीचे पाणी वळवल्यास जंगल नष्ट होणार असल्याने संबंधित प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली.
‘म्हादई वाचवा; आमचे भविष्य वाचवा’ या घोषणेखाली सरदार हायस्कूल मैदानावरून सुरू झालेला हा मोर्चा कॉलेज रोड आणि कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. हातात ‘म्हादई वाचेल तर मलप्रभा वाचेल’, ‘आमची म्हादई वळवू नका तिला मुक्त वाहू द्या’, ‘आमचे पाणी आमचा हक्क.. म्हादई वळवल्यास आमची दुर्दशा’ असे फलक घेऊन पर्यावरणप्रेमी, शेतकरी आणि नागरिकांनी घोषणा दिल्या. या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मोर्चाची सांगता झाली आणि जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्या सरकार दरबारी मांडण्याचे आश्वासन दिले. या जनआंदोलनाचे नेतृत्व दिलीप कामत, शिवाजीराव कागणीकर, कॅ. नितीन धोंड, अमृत चरंतीमठ, लिंगराज जगजंपी, सुरेश हेबळीकर, नाईला कोयलो, नीता पोतदार, श्रीमती शारदा गोपाळ, सुजित मुळगुंद आदींनी केले.