गर्दीत 2 मोबाईल लंपास! खानापूर बसस्थानकात पुन्हा चोरी
खानापूर: येथील नवीन बसस्थानक परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, गेल्या तीन दिवसांत तीन चोरीच्या घटना घडल्या आहेत. रविवारी (दि. 20) सायंकाळी सुमारे सहा वाजता, प्रवाशांच्या खिशातून दोन मोबाईल चोरीला गेले.

खानापूरहून बेळगावकडे जाणाऱ्या बसमध्ये चढताना दोन अज्ञात मुलांनी गर्दीचा फायदा घेत, मागून येत दोन प्रवाशांचे मोबाईल चोरले. यापैकी एक प्रवासी गोव्यातील पत्रकार असून, ते कामानिमित्त बेळगावला जात होते. बसमध्ये चढत असताना त्यांच्या खिशातून मोबाईल लंपास झाला. मोबाईल गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी इतर प्रवाशांना सावध केले. त्यावेळी निलवडे येथील एका तरुणाचाही मोबाईल चोरीला गेल्याचे उघड झाले. संबंधित तरुण बंगळूरमधील सॉफ्टवेअर कंपनीत काम करत असून, रेल्वेने प्रवासासाठी बेळगावमार्गे निघाला होता.
या घटनेची माहिती खानापूर पोलिसांना देण्यात आली असून, त्यांनी तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी एका प्रवाशाचे 14000 रोख रक्कमही चोरीला गेली होती.
या वाढत्या घटनांमुळे पोलिसांनी बसस्थानक परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या चार महिलांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. चोरीच्या घटनांसाठी 12 ते 15 वयोगटातील मुलांचा वापर होत असल्याचा पोलिसांना संशय आहे. रविवारी अशा दोन मुलांना बसस्थानक परिसरात गर्दीत शिरताना पाहण्यात आले होते. सध्या पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
चोरी रोखण्यासाठी बसस्थानक परिसरात 112 आपत्कालीन मदत वाहन आणि दोन कॉन्स्टेबल तैनात करण्यात आले आहेत. मात्र, चोरट्यांच्या धाडसामुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.