खानापूर तालुक्यातील जवानाचा लष्करी सेवेनंतर सन्मान
खानापूर – भावकेश्वरी सैनिक संघ, कुप्पटगिरी यांच्या वतीने गावात एका सन्माननीय सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या समारंभात हवालदार श्री. सारंग नारायण पाटील (सिग्नल रेजिमेंट) यांचा २२ वर्षांच्या प्रदीर्घ सैनिकी सेवेनंतरच्या निवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला.

विशेष म्हणजे, हा सत्कार श्री. संजीव पाटील (ऑनरी कॅप्टन) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. श्री. संजीव पाटील हे देखील लष्करातून सेवानिवृत्त अधिकारी असून त्यांनी आपल्या प्रेरणादायी उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष भार दिला.
श्री. सारंग पाटील यांनी 23 मे 2003 पासून 3 जून 2025 पर्यंत भारतीय लष्करात सेवा बजावली. त्यांनी सिग्नल रेजिमेंटमध्ये कार्यरत असताना विविध ठिकाणी देशसेवा केली असून, त्यांच्या सेवेतील निष्ठा, शिस्त आणि कर्तव्यपरायणतेसाठी त्यांचा गावाकडून विशेष सन्मान करण्यात आला.

समारंभाला गावातील मान्यवर, संघाचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री. पाटील यांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या सेवेचा अभिमान व्यक्त करत उपस्थितांनी देशसेवेसाठी केलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संयोजन भावकेश्वरी सैनिक संघाने केले असून, अशा गौरव समारंभांमुळे युवकांमध्ये देशसेवेची प्रेरणा निर्माण होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.