शाळा सुट्टी होती, अन्यथा घडला असता मोठा अपघात,शाळेचे पत्रे वादळी वाऱ्याने उडाले
प्रतिनिधी: खानापूर तालुक्यासह जोयडा तालुक्याच्या पश्चिम भागात मागील दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून, काही रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

या पावसात जोयडा तालुक्यातील अखेती ग्रामपंचायत क्षेत्रातील करंबल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पत्रे काल सकाळी सुमारे 11 वाजता वादळात उडून गेले. स्लॅबमधून पाणी येऊ नये म्हणून गळतीपासून बचावासाठी स्लॅबवर पत्रे बसवण्यात आले होते. मात्र, वाऱ्याचा जोराने हे सर्व पत्रे उडून शाळेसमोर पडले.

सुदैवाने, खराब हवामानाची पूर्वकल्पना घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे शाळेत विद्यार्थी उपस्थित नव्हते आणि एक मोठी दुर्घटना टळली.
ही घटना ग्रामस्थांसाठी धक्कादायक ठरली असून, शाळेच्या इमारतीची तात्काळ दुरुस्ती करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.