सिग्नल सुटताच वेगात निघाले, थेट टँकरखाली गेले
बेळगाव: राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे आज (सोमवारी) सकाळी एक थरारक घटना घडली. सिग्नल सुटताच सिग्नल ओलांडण्याच्या घाईत असलेले एक मोटरसायकलस्वार जोडपं थेट टँकरखाली गेलं. मात्र आजूबाजूच्या लोकांच्या तत्परतेमुळे त्यांचा थोडक्यात बचाव झाला.
शहरातील अनेक सिग्नल पॉइंट्सवर सध्या हेच चित्र दिसून येतं – सिग्नल सुटताच सर्वांना तो आधी ओलांडायची घाई असते. या घाईगडबडीत आपल्या किंवा इतरांच्या जीवाला धोका होतोय, याचं कोणालाच भान राहत नाही. प्रत्येक जण समोरील वाहन चालकाला मागे टाकून पुढे जाण्याच्या प्रयत्नात असतो.
हीच स्थिती आज सकाळी चन्नम्मा सर्कलवरही पाहायला मिळाली. कोल्हापूर सर्कलकडून शहरात येणाऱ्या रस्त्यावर एक मोटरसायकलस्वार जोडपं सिग्नल सुटताच वेगाने पुढे जात असताना तोल जाऊन थेट शेजारील टँकरखाली पडलं. मात्र सुदैवाने आजूबाजूच्या लोकांनी वेळेवर मदतीला धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
वाहनचालकांनी सिग्नल पाळण्याची गरज
या घटनेनंतर पुन्हा एकदा सिग्नलचे नियम पाळण्याची गरज अधोरेखित झाली आहे. जीव धोक्यात घालून क्षणभराची घाई करणे किती धोकादायक ठरू शकते, याचे हे जिवंत उदाहरण ठरलं आहे.