चंद्रभागा नदीत बेळगावच्या भाविकाचा बुडून मृत्यू; वारीत दुःखद घटना
पंढरपूर (ता. २० जून): आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला गेलेल्या भाविकांमध्ये एक दुःखद घटना घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातून गेलेल्या शुभम पावले (वय 27) या तरुण भाविकाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. नदीत स्नान करत असताना ही घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षीही हजारो भाविक आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. चंद्रभागा नदीत स्नान करून विठोबा रुख्मिणीचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. मात्र, गुरुवारी सकाळच्या सुमारास बेळगावमधून गेलेला एक भाविक नदीत उतरला आणि अचानक पाण्याच्या प्रवाहात अडकला. मदतीसाठी काही लोकांनी प्रयत्न केले, मात्र त्याला वाचवता आले नाही.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन गंभीर का नाही?
वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चंद्रभागेच्या घाटावर पर्याप्त सुरक्षा व्यवस्था नसल्याने वारकऱ्यांचे जीव धोक्यात येत असल्याचा आरोप काही स्थानिकांनी केला आहे. पोलिस बंदोबस्त, मदत पथक आणि इतर आपत्कालीन व्यवस्था योग्य पद्धतीने असावी, अशी मागणी भाविक व स्थानिक नागरिकांकडून होत आहे.