आमगाव गावकऱ्यांचे आमदारांना निवेदन: “आधी राहण्यासाठी जागा द्या, मगच स्थलांतर”
खानापूर: तालुक्यातील आमगाव येथील ग्रामस्थांनी संभाव्य गाव स्थलांतराच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडली आहे. “गाव स्थलांतर करायचे असेल, तर त्याआधी आम्हाला नव्या वसाहतीसाठी योग्य जागा आणि प्रत्येकी 15 लाख पेक्षा अधिक रुपयांची भरपाई द्या,” अशी मागणी आज ग्रामस्थांनी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावात सध्या कोणतीही मूलभूत सुविधा नाही, तरीही थेट स्थलांतर न करता आधी नव्या ठिकाणी राहण्यासाठी जमीन, शाळा, अन्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी त्यांनी ठाम भूमिका मांडली आहे.
यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी ग्रामस्थांची व्यथा ऐकून घेतली आणि लवकरच जिल्हाधिकारी (डीसी) व पालकमंत्र्यांसोबत बैठक घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, “या संदर्भात आम्ही गावकऱ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत आणि त्यांच्या मागण्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचवणार आहोत. शासनाने निर्णय घेतलाच तर आधी सुविधा उपलब्ध करून मगच स्थलांतर करावे, अशी आमची भूमिका राहील.”