मराठी भाषिकांवरील कन्नड सक्ती विरोधात आमदार विठ्ठल हलगेकर यांना निवेदन
खानापूर – महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांना कन्नड सक्तीबाबत निवेदन देण्यात आले. खैरवाड (ता. खानापूर) येथे आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान ही भेट घेण्यात आली.
या प्रसंगी शुभम शेळके यांनी आमदारांना सादर केलेल्या निवेदनात कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या कन्नड सक्तीचा तीव्र निषेध नोंदवत ही सक्ती तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. मराठी भाषिकांमध्ये या जबरदस्तीमुळे तीव्र असंतोष पसरलेला असून, आपणही स्वतः मराठी भाषिक असल्यामुळे हा प्रश्न आपण गांभीर्याने घ्यावा, अशी विनंती करण्यात आली.
कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी यापूर्वी दिलेल्या निवेदनाची आठवण करून देताना खानापूर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानक, इस्पितळ व हेस्कॉम कार्यालयांवर मराठी फलक लावण्यात आले नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. निवेदनात भाषिक अल्पसंख्याकांसाठी असलेल्या कायदेशीर तरतुदींचा उल्लेख करत, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पर्यंत हा आवाज पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले. हा विषय केवळ राजकीय न राहता मराठी भाषिकांच्या अस्मितेशी संबंधित असल्यामुळे त्यावर योग्य तो निर्णय घेण्याची गरज असल्याचे नमूद केले.
या निवेदनावर आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आश्वासन दिले की, “मी स्वतः मराठी मतदारांच्या पाठिंब्यामुळे निवडून आलो आहे. कन्नड सक्ती थांबली पाहिजे, या मताचा मीही आहे. मराठी वाचवण्यासाठी आपण करत असलेले कार्य गौरवास्पद आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून विनंती करणार आहे,” असे त्यांनी आश्वासन दिले.
यावेळी सरचिटणीस मनोहर हुंदरे, धनंजय पाटील, महादेव पाटील, शिवाजी हावळाण्णाचे, पिराजी मुंचडीकर, चंद्रकांत पाटील, नारायण मुंचडीकर, रमेश माळवी, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन गोरले, जोतिबा येळ्ळूरकर, अशोक डोळेकर, प्रतिक गुरव, सचिन दळवी, अशोक घगवे, महेंद्र जाधव, विजय जाधव, सुरुज जाधव, राजू पाटील, प्रविण पाटील, उमेश पाटील, निलेश काकतकर, साईराज कुगजी, ज्ञानेश्वर चिकोर्डे, प्रशांत बैलूरकर, अभिषेक कारेकर, शुभम जाधव, रोशन पाटील, श्रीकांत नादूंरकर, शंकर पाखरे, भरत पाटील, किरण पाटील, विनायक सुतार, प्रसाद पाटील, भरमाणी पाखरे, राजु पावले, रामलिंग चोपडे, जोतिबा चोपडे, वैभव पाटील, ओमकार पाखरे, संजय पाटील, विनायक पाटील, मल्लाप्पा मदार, सागर कणबरकर, विनायक हुलजी, सुर्याजी पाटील, प्रतिक देसाई, बळीराम पाटील यांच्यासह मराठी भाषिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.