तोपिनकट्टी येथील श्री महालक्ष्मी हायस्कूलमध्ये “शैक्षणिक तिहेरी मार्गदर्शन” कार्यक्रम संपन्न
तोपिनकट्टी (ता. खानापूर) – श्री महालक्ष्मी हायस्कूल, तोपिणकट्टी येथे पितृ दिनाचे औचित्य साधून “पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांना शैक्षणिक तिहेरी मार्गदर्शन” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून कोल्हापूर येथील आदर्श प्रशाळा शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर. वाय. पाटील (B.A., B.Ed. – Special) उपस्थित होते.
श्री. पाटील यांनी आपल्या 30 वर्षांहून अधिक अनुभवावर आधारित सखोल मार्गदर्शन करताना गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास व शाळेतील संस्कारात्मक वातावरणाचे महत्व अधोरेखित केले. त्यांनी शाळांमधील यशस्वी उदाहरणांचा दाखला देत, प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेट देण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
शिक्षकांना उद्देशून बोलताना ते म्हणाले, “विद्यार्थ्यांसाठी शिक्षक हे दुसऱ्या वडिलांच्या भूमिकेत असतात. शिक्षक जर जबाबदारीने आणि प्रेमाने विद्यार्थ्यांना घडवले, तर ते नक्कीच गुणवंत होतील.“
पालकांना मार्गदर्शन करताना त्यांनी एक महत्त्वपूर्ण संदेश दिला की, “मुलांच्या वाढदिवशी त्यांना खेळणी किंवा गिफ्ट देण्याऐवजी एक चांगले पुस्तक द्या. यामुळे त्यांच्या वाचनाची आवड निर्माण होईल आणि ज्ञानाचा खजिना त्यांच्यासमोर खुले होईल.“
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील एकाग्रता आणि जिज्ञासेचे निरीक्षण करत त्यांनी सांगितले की, “या गावातील विद्यार्थ्यांमध्ये मोठे स्वप्न पाहण्याची ताकद आहे. फक्त योग्य दिशा आणि प्रेरणा दिल्यास येथून आयएएस, आयपीएस अधिकारी, डॉक्टर, अभियंते, सैनिक व आदर्श शिक्षक घडू शकतात.“
या कार्यक्रमास तोपिणकट्टी व बिद्दरभावी गावांतील 200 हून अधिक पालक, शिक्षक आणि इयत्ता सातवी ते दहावीचे विद्यार्थी, तसेच दोन्ही गावांतील प्राथमिक शाळांचे शिक्षक व एसडीएम सदस्य, श्री महालक्ष्मी हायस्कूलचे संचालक, शिक्षकवृंद, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी माजी विद्यार्थी संघटनेने पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नामुळे कार्यक्रमाची प्रभावी रूपरेषा तयार झाली आणि सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. माजी विद्यार्थ्यांचा उद्देश स्पष्ट होता – “आपण ज्या गावात जन्मलो, त्या मातीत शिकावे आणि मातृभाषेतूनच शिक्षण घेऊन गावाच्या विकासात वाटा उचलावा.“
या प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन उर्जा संचारली असून, पालक व शिक्षकांनाही आपली भूमिका अधिक जबाबदारीने पार पाडण्याची जाणीव झाली.